Folowers

योजना तळागाळापर्यंत पोहोचवून लोकाभिमुख प्रशासन घडवा - कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल


ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा संकल्प’ अभियानाचा दिमाखदार शुभारंभ; विविध योजनांचे लाभ वाटप, वनपट्टे वाटप आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती


ठाणे(जिमाका): प्रशासकीय यंत्रणेने अधिक संवेदनशील, कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ सहजतेने पोहोचवला पाहिजे. सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने एकत्र येऊन जनसामान्यांची अविरत सेवा करणे, हाच आपला खरा धर्म असून, प्रत्येकाने जबाबदारीने आणि आग्रही प्रयत्नांतून गरजू लाभार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज येथे केले.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात आज कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा संकल्प’ अभियानाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. 

    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी वरुणकुमार सहारे, शशिकांत गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, उमेश पाटील, प्रदीप कुडाळ, विकास गारुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

   उद्घाटनपर मनोगतात विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिमेवर आणि कार्यसंस्कृतीवर भर देत स्पष्ट केले की, जनतेच्या समस्यांचे निराकरण तत्परतेने होणे हीच प्रशासनाची खरी ताकद आहे. नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर प्रशासनाने स्वतः लोकांच्या दारात पोहोचले पाहिजे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला, विशेषतः वंचित आणि गरजूंना, योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.    

     कार्यक्रमादरम्यान उपस्थित लाभार्थ्यांनी त्यांना वेळेत मिळालेल्या लाभाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

     जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात पीएम विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांणंद रस्ते योजना, आरोग्य विभागाचे विविध उपक्रम, 'श्रीगणेश आरोग्याचा' उपक्रम, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे गतिमान कामकाज, महिला आरोग्य शिबिरे, एसआयआर उपक्रम तसेच नवमतदार नोंदणी यांसारखे समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत.

*विविध योजनांच्या लाभांचे थेट वितरण*

    कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभांचे मान्यवरांच्या हस्ते थेट वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत राहुल विलास शंभरकर, कावेरी कुंदन पाटेकर, प्रवीण तुकाराम घुले, हरनित कौर परमजीत सिंग बागल आणि विजय गणपत पवार या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले. 

     तसेच अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ अंतर्गत शहापूर व भिवंडी तालुक्यातील पात्र वैयक्तिक वनहक्क धारक आदिवासी बांधवांना नवीन गाव नमुना व वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले.

     पारंपरिक कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या 'प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजने'चा मेळावाही या वेळी आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ३६ हजार ७०४ अर्जांपैकी १४ हजार ९०० अर्ज पात्र ठरले असून, शेकडो लाभार्थ्यांना प्राथमिक प्रशिक्षण, टूलकिट व खेळते भांडवल वितरित करून त्यांच्या उपजीविकेला नवी दिशा देण्यात येत आहे. 

      त्याचबरोबर, ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करणाऱ्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने'अंतर्गत जिल्ह्यातील ४८४ रस्त्यांच्या नियोजनासह भिवंडी तालुक्यातील मौजे कुहे येथील शेत रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश आयुक्त महोदयांच्या हस्ते शेतकरी लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले.

     राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावंतांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत (MoRTH) आयआयटी मद्रासच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२६ निमित्त 'MyGov' पोर्टलवर आयोजित 'शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट'मध्ये अंबरनाथ येथील श्रीमती शालिनी श्यामल दत्ता यांनी पटकावलेला प्रथम क्रमांक (२० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र) आणि ठाण्याचे श्री. नीर हरीश मकोरिया यांनी पटकावलेला तृतीय क्रमांक (७,५०० रुपये रोख व प्रमाणपत्र) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

      तसेच महसूल प्रशासनातील उत्तम कार्याची दखल घेत महसूल सहायक संवर्गातून सहायक महसूल अधिकारी संवर्गात पदोन्नती मिळालेल्या श्री. प्रकाश रोहिदास बनसोडे, श्रीमती ज्योती अनिल भोसले, श्री.सुनिल जानु भोये, श्रीमती रूपाली ईश्वर विरकर आणि दिव्यांग प्रवर्गातील श्री. रमेश महिपत घोसाळकर या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

      कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत