'नागरिकांच्या सहकार्याने ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करणे शक्य'
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन
'करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे' या कार्यक्रमात पर्यावरण वीरांना पुरस्कार प्रदान
ठाणे: नागरिकांच्या सहकार्याने आपले ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करणे शक्य आहे. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा आणि नागरिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 'करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे' या बहुपेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आरंभी आयुक्त राव यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच, पर्यावरण रक्षणासाठी निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नागरिक आणि संस्थांचा पारितोषिके प्रदान करून गौरवही केला. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त दिनेश तायडे (परिमंडळ ३), मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, श्रीकला संस्कार न्यासच्या दिपाली काळे आदी उपस्थित होते.
आपण प्रातिनिधिक स्वरुपात एक दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असलो तरी प्रत्यक्षात प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिनच असतो. आपण करत असलेला श्वाच्छोसवास हा या पर्यावरणाची देणगी आहे. त्याचे कायम स्मरण ठेवून या पर्यावरणाच्या रक्षणात आपण आपला वाटा उचलला पाहिजे, असे आयुक्त राव यांनी सांगितले.
पंचमहाभुतांच्या पाचही घटकांच्या संवर्धन आणि संतुलनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असते. त्या प्रयत्नांमध्ये लहान मुले, युवक-युवती, माध्यमे, कंपन्या, गृहसंकुले, शासकीय विभाग या सगळ्यांनी हातभार लावला तर हे कार्य सोपे होईल. त्यातून वायू, जल, ध्वनी या प्रदूषणांचा आपल्यावरील परिणाम सिमित करणे शक्य होईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
आपल्या शहराचा विचार करता नाल्यात पडणारा कचरा ही मोठी पर्यावरणीय समस्याच आहे. त्याला आळा घालण्यात महापालिकेच्या प्रयत्नात जशा काही त्रुटी आहेत, तशाच त्या नागरिकांच्या व्यवहारातही आहेत. नाल्यातील हजारो टन कचरा, विशेषत: प्लास्टिकचा कचरा हा पर्यावरणाचे आणि त्यायोगे पुढील पिढीचे नुकसान करत आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नका, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडते आहे. तसेच, नाल्यात कचरा टाकण्यापेक्षा थोडी कळ सोसून तो कचऱ्याच्या गाडीतच टाकण्याबाबत नागरिकांचा आळसही दिसतो आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही नागरिकांशी त्यांच्या वस्तीत जाऊन संवाद साधत आहोत. प्लास्टिकमुक्तीचे अभियान राबवून नागरिकांच्या सहकार्याने ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करून दाखवू, अशी ग्वाही याप्रसंगी आयुक्त राव यांनी दिली.
या कार्यक्रमात, श्रीकला संस्कार न्यासच्या कलाकारांनी विविध नृत्ये, नाटिका, स्टॅण्डअप कॉमेडी, प्रश्नमंजुषा स्पर्धा आदी सादर केले. त्याबद्दलही आयुक्त राव यांनी संस्थेचे कौतुक केले. पर्यावरणविषयक जागृतीसाठी संस्थेने अभिनव पद्धतीने मांडणी केली, असे आयुक्त म्हणाले.
या कार्यक्रमात, पर्यावरणपुरक प्रकल्पांसाठी टीसा, एन्ह्यारोकेअर, मायक्रो मास्टर लॅब, ऑक्सिकेअर इंडस्ट्री, झिरो डी इंडस्ट्री यांना पुरस्कार देण्यात आला.
तर, 'माझी वसुंधरा' या शासनाच्या अभियानाअंतर्गत ज्या शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी वातावरण बदल या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला व पर्यावरणपूरक कामे केली अशा व्हिपीएम पॉलिटेक्निक, एपी शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांचा गौरव करण्यात आला.
त्याचबरोबर, रहिवासी संकुलात वृक्षारोपण, सोसायटीच्या आवारात उद्यान, टेरेस गार्डन करणाऱ्या उत्कृष्ट रहिवासी संकुलांना पुरस्कार देण्यात आला. त्यात, कशीश पार्क, स्वस्तिक गार्डन, सिद्धांचल फेज-1, ओझोन व्हॅली, निलकंठ हाईट्स, गार्डन इस्टेट, सनक्रेस सोसायटी, ग्रेस स्क्वेअर, गोदरेज एमराल्ड, कॉसमॉस महुआ, विकास कॉम्पलेक्स, टाटा हाऊसिंग, दोस्ती विहार, सुकुर पार्क यांचा समावेश आहे.
समर्थ भारत व्यासपीठ, ॲन्टी प्लास्टिक बिग्रेड, परिसर भगिनी विकास संघ यांनी रहिवासी संकुलांमध्ये केलेल्या जनजागृतीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तर, त्यास उत्सर्फुतपणे प्रतिसाद देऊन ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या ऋतुपार्क, ॲक्युरा रूस्तुमजी अरबेनिया, तारंगन, रविउदय, रोझा गार्डनिया, दोस्ती इम्पेरिया, बाल स्नेहालय, नंदनवन होम्स, खारेगाव यांना पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी अलार्क देसाई, उल्हास परांजपे, उत्तरा परांजपे, कौस्तुभ ताम्हणकर, अजित करकरे, गौरी करकरे, रमाकांत बारी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले.

Post a Comment