रेल्वे प्रवासही झाला जीवघेणा वर्षभरात ३११ प्रवाशांनी गमावले प्राण

 


ठाणे : रेल्वेचा प्रवास सुखरूप, जलद आणि कमी खर्चिक मानला जातो. परंतु असे असले तरी आता प्रवाशांची वाढणारी तुडुंब गर्दी आणि त्यांच्याकडुन होणाऱ्या नियमांच्या पायमल्लीमुळे शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. ठाणे रेल्वेच्या हद्दीत वर्षभरात ३११ प्रवाशांना अशाप्रकारे जीव गमावावा लागला असून ११३ जणांना जखमी व्हावे लागले आहे.


प्रवाशांना कमी खर्चात जलदगतीने गंतव्य ठिकाणी जायचे असेल तर रेल्वे हा उत्तम पर्याय मनाला जातो. मात्र आता हा पर्याय देखील त्यांच्याकरीता सुरक्षित राहिलेला नाही. कारण गाडी पकडण्याच्या घाईत ठाणे रेल्वेच्या हद्दीत एका वर्षात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर २०२३ या काळात तब्बल ३११ जणांना जीव गमावावा लागला आहे. त्यामध्ये २२८ पुरुष आणि २८ महिलांचा समावेश आहे. त्यात २६६ जणांच्या अपघाती आणि ४५ जणांच्या नैसर्गिक मृत्यूचा समावेश आहे. तर एका महिलेसह दोन पुरुषांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्या आहेत. जिन्यावरून चालताना / उतरताना, रुळ ओलांडताना, घाईत गाडी पकडताना / उतरताना झालेल्या अपघातात वर्षभरात ११३ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये १३ महिलांचा समावेश आहे. ठाणे रेल्वे पोलिसांची हद्द मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकापर्यंत तर हार्बर रेल्वेच्या ऐरोली, तळोजा पर्यंत आहे. या हद्दीमध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत. त्यातील कोपरी पूल, खाडी पूल, कळवा फाटक, रेतीबंदर, दिवा क्रॉसिंग ही ठिकाणे अधिक धोकादायक आहेत. अपघात घडण्याचे प्रमाण या ठिकाणी जास्त आहे.

रेल्वे प्रशासनाकडून वारंवार रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षा बाबत माहिती दिली जाते. तसेच रूळ ओलांडणे, रुळावरून चालणे, नो एन्ट्री मध्ये घुसणे आदी नियमांचा भंग केल्याप्रकरणी रेल्वे कडून कायदेशीर, दंडात्मक कारवाई देखील केली जाते. मात्र त्याकडेही अनेकांकडून दुर्लक्ष केले जाते. अनेकदा प्रवासी रेल्वे पकडण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग अवलंबत असतात, रेल्वेमधून उतरून पटकन स्थानकाबाहेर जाता यावे यासाठी घाई करतात. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असते.


पोलिसांकडून नेहमीच रेल्वे प्रवाशांच्या जीविताची, मालमत्तेची काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही केली जाते. परंतु असे असतानाही शॉर्टकट आणि घाई करण्याच्या नादात अनेक जण जीव धोक्यात घालतात. रेल्वेच्या दरवाजातून बाहेर डोकावणे, रुळ ओलांडणे, रेल्वे पुलाचा वापर न करणे, धावती गाडी पकडणे यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढते. यातूनच काही अप्रिय घटना घडतात आणि त्यामध्ये प्रवाशांचा नाहकपणे जीव  गमावावा लागतो किंवा जखमी व्हावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित राहण्यासाठी अधिक काळजी घेणे, नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.


- पंढरी कांदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत