राष्ट्रवादी (श.प) च्या नगरसेवकाने केली ठामपा आवारातच आंघोळ
पाणीटंचाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
नगरसेवकाला पालिका मुख्यालयातील पाण्याने आंघोळ करावी लागत असेल तर तो काळा दिनच - मनोज प्रधान
तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार
ठाणे - गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्याने पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आले नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजीत पवार यांनी थेट ठामपा मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली.
ठाणे महानगर पालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात 550 दशलक्ष लीटरच्या आसपास पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई भेडसावत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच आलेले नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजीत पवार यांनी अनोखे आंदोलन करून वाट मोकळी करून दिली.

Post a Comment