प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे: अच्युत गोडबोले
महावितरणचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात
मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगात अमुलाग्र बदल होत आहे. या बदलांना आत्मसात केले तरच प्रगती शक्य आहे, असे मत प्रख्यात लेखक श्री. अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
महावितरणच्या येथील सांघिक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात झाला. यावेळी मुख्य व्याख्याते म्हणून श्री. गोडबोले बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन), श्री. अनुदीप दिघे (वित्त) व श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) आणि कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, श्री. परेश भागवत, सौ. स्वाती व्यवहारे, सौ. अपर्णा गिते उपस्थित होते.
या कार्यक्रमात 'दैनंदिन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर' या विषयावर श्री. अच्युत गोडबोले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेने आपले आसपासचे सर्व क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा प्रभावी वापर केल्यास सर्वच क्षेत्रात यश मिळू शकते, असे गोडबोले म्हणाले.
नवतंत्रज्ञानाची माहिती महावितरणचे अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना मिळावी तसेच कौटुंबिक स्नेहमेळाव्यातून परसस्परातील स्नेहभाव वृद्धींगत व्हावा या उद्देशाने कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी दिली. या स्नेह मेळाव्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळेल असे प्रतिपादन संचालक श्री. अनुदिप दिघे यांनी केले. दुपारच्या सत्रात सादर झालेल्या 'रंगी रंगला महाराष्ट्र' पारंपरिक नृत्यांनी बहरलेल्या संगीतमय कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला महावितरणच्या सांघिक कार्यालयातील अभियंता, अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येत उपस्थित होते. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौटुंबिक धमाल केली. लहान मुले, महिला व पुरुषांच्या गटातील विविध खेळ, अधिकारी व कर्मचारी यांच्यात आपुलकीची चर्चा, व्याख्याने तसेच पारंपरिक नृत्यांचा संगीतमय कार्यक्रम आदींनी कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले
.

Post a Comment