ठाणे महानगरपालिकेच्या हवा गुणवत्ता सुधारणा प्रकल्पाचा 'आयफॅट इंडिया २०२५' या कार्यक्रमात गौरव




        ठाणे (१५) : ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पाअंतर्गत महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचा गौरव 'आयफॅट इंडिया २०२५' या कार्यक्रमात 'हरित यशोगाथा सन्माना'ने करण्यात आला. 'वायू' या संकल्पनेवर, दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत, ठाणे महापालिकेस गौरविण्यात आले आहे.


        महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई आणि युनिसेफ, महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयफॅट इंडिया २०२५ या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वृद्धीसाठी, नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान कृतींबाबत स्थानिक आवश्यकता निश्चित करण्यासाठी 'माझी वसुंधरा अभियाना'त गुरूवार, १४ ऑक्टोबर रोजी 'आयफॅट इंडिया २०२५'चे मुंबईत आयोजन करण्यात आले. 


       राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर, 'महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील हवामानाची स्थिती' या विषयावरील कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेस 'हरित यशोगाथा सन्मान-२०२५' देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने हा सन्मान उपायुक्त (पर्यावरण) मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला.


           ठाणे महानगरपालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पात हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात, १२३ ई बसेस खरेदी करण्यात आली आहे. आणखी १६० इबसगाड्यांची निविदा अंतिम टप्प्यात आहे. तसेच, उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात दोन लाखापर्यंत वृक्ष लागवड कऱण्यात आली आहे. त्यात, मियावाकी वृक्ष लागवडीचा समावेश आहे. ठाण्यातील बांधकामस्थळी नियमितपणे धुळ नियंत्रणाची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच, मोठ्या रस्त्यांच्या सफाईसाठी यांत्रिक सफाईची पद्धतही वापरली जात आहे. धूळ प्रदूषण नियंत्रणाबाबत विविध स्तरांवर जनजागृती करण्यात येत असून ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असल्याची नोंद या सन्मानासाठी घेण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत