सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर ठाणे जिल्ह्यात ४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न !
अंतिम विजय धर्माचा असल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा ! – सनातन संस्थेचे आवाहन
ठाणे - धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे.; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. भक्ती गैलाड यांनी आज ठाण्यातील सी.के.पी. सभागृहात केले. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. संस्थेच्या वतीने यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव विविध भाषांमध्ये देशभरातील ७७ ठिकाणी आणि ठाणे जिल्ह्यात ४ ठिकाणी साजरा करण्यात आला.
सौ. गैलाड पुढे म्हणाल्या की, भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमणे होत आहेत, ती केवळ विस्तारवादासाठी नाहीत, तर हिंदु धर्माला संपवण्यासाठी होत आहेत. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी ‘देश’ विचारून नाही, तर ‘धर्म’ विचारून गोळ्या झाडल्या. आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहासही हेच सांगतो की, जेथे जेथे धर्मांध माजले, तेथे त्यांनी हिंदूंना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले. आज आपण युद्धसदृश अवस्थेत आहोत. हे फक्त सीमांवरील लढाईसारखे वाटत असले, तरी खरे युद्ध हे धर्मयुद्धच आहे.
महोत्सवाचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. हिंदुत्वासाठी कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील सनातन निर्मित ग्रंथांचे आणि फलकांचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते. ठाण्यातील सी.के.पी. सभागृहात महोत्सवाच्या ठिकाणी लावण्यात आलेले शिवकालीन अस्त्र-शस्त्रांचे प्रदर्शन शिवकालीन इतिहासाची साक्ष देत होते.
ठाण्यातील सी.के.पी. सभागृहात पार बसलेल्या गुरुपौर्णिमेला हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी संबोधित केले, वर्तक नगर येथील आईमाता सभागृहातील महोत्सवात उपस्थितांना मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या स्वाती दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभले. डोंबिवलीतील शुभ मंगल सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला प्रेरणादायी वक्ते, व्यंगचित्रकार आणि प्रकाशक श्री. विवेक मेहेत्रे यांनी संबोधित केले तर बदलापूर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव: देश-विदेशांतील हजारो भाविकांसाठी मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला.

Post a Comment