“स्टॉप डायरिया” राष्ट्रीय मोहीम ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू
(जिल्हा परिषद, ठाणे) – भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालय यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने, “स्टॉप डायरिया” (Stop Diarrhoea Campaign) ही महत्त्वाची जनजागृती मोहीम २० जून २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा उद्देश अतिसारासारख्या पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांपासून बालकांचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे, स्वच्छता व सुरक्षित पाणी यावर भर देणे, आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.
अभियानाचा कालावधी व टप्प्यांनुसार कृती आराखडा
पहिला व दुसरा आठवडा (२० जून ते ३० जून २०२५)
• अभियानाचा शुभारंभ: जिल्हा व तालुका स्तरावर बैठकीद्वारे “स्टॉप डायरिया” मोहिमेचा औपचारिक शुभारंभ.
• पाणी गुणवत्ता तपासणी: शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे व इतर संस्थांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण.
• प्रशिक्षण व जनजागृती: नागरिक, शासकीय कर्मचारी व संस्थांना पाणी, स्वच्छता व आरोग्य यावरील प्रशिक्षण.
• पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकांचे आयोजन.
तिसरा व चौथा आठवडा (१ जुलै ते १५ जुलै २०२५)
• गावपातळीवर पाणी समित्यांचे सक्षमीकरण: स्थानिक पातळीवरील पाणी स्रोत व स्वच्छतेच्या सुविधांचे व्यवस्थापन.
• जागृती मोहीम: स्वच्छतेचा दर्जा राखण्याकरिता गावकऱ्यांचा सहभाग.
• मैलागाळ व्यवस्थापन व स्वच्छ भारत मिशनचा प्रचार.
• घरगुती नळ जोडण्याची कार्यपद्धती तपासणे.
पाचवा व सहावा आठवडा (१६ जुलै ते ३१ जुलै २०२५)
• गावपातळीवरील प्रशिक्षण: ग्रामस्थांना स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्यासाठी NGO व समूहांमार्फत प्रशिक्षण.
• पावसाळी पाणी संकलनावर जागरूकता: छतावरील पाणी संकलन आणि पाणी साठवणुकीबाबत माहिती.
• हातपंपांची तपासणी व दुरुस्ती.
• स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्तता व स्वच्छ वर्तनाविषयी जनजागृती.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे यांचे आवाहन:
“सर्व विभागांनी एकत्रितपणे समन्वयाने काम करून 'स्टॉप डायरिया' मोहिमेचा प्रभाव गावागावात जाणवेल अशा पद्धतीने यशस्वीपणे राबवत आहेत. ही मोहीम केवळ आरोग्याशी संबंधित नसून, ती सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि सशक्त समुदाय विकासाची पायाभूत गरज आहे म्हणून सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग नोंदवावा.”
Post a Comment