पाणी बिलाची थकबाकी तातडीने वसूल करावी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे निर्देश
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी. तसेच, थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडित करावे, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २२३ कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. त्यात, ८८ कोटी रुपयांची थकबाकी असून १३४ कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहेत. त्यापैकी, २२ कोटी रुपयांची थकबाकी तर ५९ कोटी रुपये चालू वर्षाची देयके असे एकूण ८१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत सुमारे १४१ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान पाणी पुरवठा विभागासमोर आहे.
थकबाकी आणि चालू बिले यांची वसुली तातडीने करावी. त्यात हयगय करू नये असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस उपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास ढोले यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित रकेमाचा भरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदारांचे नळ संयोजन तत्काळ खंडित करावे. हे नळ संयोजन परवानगीशिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक, गृहसंकुल यांचे नळ संयोजन मुख्य जलवाहिनीवरून खंडित करण्याचे आदेश, माळवी यांनी दिले. आवश्यक ठिकाणी मोटर, पंप जप्त करून पंप रूम सील करण्याची कारवाई करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.
प्रभाग समितीनिहाय वसुलीची टक्केवारी
1. वर्तकनगर - ४८.६०
2. उथळसर - ४७.५१
3. लोकमान्य / सावरकर नगर - ४१.७०
4. मुंब्रा - ४१.२९
5. माजिवडा-मानपाडा - ४१.१२
6. नौपाडा-कोपरी - ३८.२२
7. कळवा - ३१.२७
8. दिवा - २५.९२
9. वागळे - १६.६३

Post a Comment