मालमत्ता हस्तांतरणचे २२ हजार प्रकरणे प्रलंबित काँग्रेसने केला भांडाफोड
ठाणे : ठाणे महापालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. महापालिकेच्या ९ प्रभाग समिती अंतर्गत तब्बल २२ हजार मालमत्ता हस्तांतरणचे प्रकरण धूळखात पडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात केवळ सहायक आयुक्तच्या सह्या शिल्लक असल्याची माहिती देखील समोर आली. येत्या २ दिवसात ही प्रकरणे मार्गी लावावी अन्यथा काँग्रेस तर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण दिला आहे.
गुरुवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतचे पुरावेच सादर केले.यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,प्रवक्ते राहुल पिंगळे,जेष्ठ नेते जे.बी.यादव उपस्थित होते. वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत एक शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकरण मार्गी लागत नसल्याची तक्रार आमच्याकडे केली होती. त्या अनुषगाने याची माहिती घेतली असता एकट्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये मागील वर्षभरापासून ३३८ प्रकरणे केवळ सहाय्यक आयुक्तच्या एका सही साठी दाबून ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर लोकमान्य प्रभाग समितीमध्ये २९० प्रकरणे अद्याप मार्गी लागू शकली नसल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर केवळ या दोन प्रभाग समितीत नाही तर सर्व ९ प्रभाग समिती मध्ये २२ हजार प्रकरणे रखडली असल्याची माहिती देत असताना काही निवडक प्रकरणे विनाविलंब हस्तांतर होत असल्याची माहीती त्यांनी दिली. यात कळवा, मुंब्रा आणि दिव्यात सर्वाधिक प्रकरणे असल्याचेही त्यांनी सांगितले. या समितीमध्ये २ हजार ते २२०० प्रकरणे दाबून ठेवली असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला,मात्र काही हस्तांतर प्रकरणे भ्रष्टाचार करित त्वरित मार्गी लावत आहेत यामध्ये कोणते अधिकारी सहभागी आहेत याची माहीती घेउन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली,पुढील २ दिवसात ही सर्व प्रकरणे मार्गी लागली नाही तर काँग्रेस आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.
Post a Comment