भाजपच्या विचार आणि विकासालाच मत देण्याचे हाजी अरफात शेख यांचे आवाहन
ठाणे, प्रतिनिधी
ठाणे, मुंबईसह देशात सर्वत्र भाजप आहे, पण मुंब्य्रात भाजप नाही. तेव्हा, विचार आणि विकासालाच मत देऊन ह्यावेळी मुंब्य्रात 'कमळ' फुलवा, असे आवाहन भाजपच्या वाहतूक शाखेचे अध्यक्ष व राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मुंब्रावासियांना केले आहे. सोमवारी हाजी अरफात शेख हे मुंब्रा स्टेशन समोरील प्रभाग क्रमांक २६ मधील आफ्रीन हॉल येथील सभेत बोलत होते.
ठाणे शहराच्या एका टोकाला वसलेल्या मुंब्रा उपनगरात भुमीपुत्रांसोबतच मुस्लिमबहुल परिसर वाढला आहे. या मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक २६ मधून भाजपच्या तिकिटावर अनुसया भगत आणि कल्पना सुर्यवंशी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या या रणरागिणींचा सामना दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीशी होत असल्याने भाजपने येथे कडवे आव्हान उभे केले आहे. या अनुषंगाने सोमवारी मुंब्य्रात राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांची प्रचारसभा मोठया जोषात पार पडली. यावेळी हाजी अरफात शेख यांनी, आ. आव्हाड यांचा ठाण्यातील घाऱ्या मामा असा तर, नजीब मूल्ला यांचा आव्हाडांचाच राबोडीतील छोटा हस्तक असा उल्लेख करून शेख यांनी टिकेची झोड उठवली. दोघेही इथले स्थानिक नसुन केवळ निवडणुका आल्या की मुंब्य्रात प्रकटतात. मुंब्यात सर्व समस्या कायम आहेत. तरीही दोघेही आपसात लढल्याचे नाटक करून येथील नागरिकांना मुर्ख बनवुन मुंब्रा लुटत आहेत. तेव्हा, ह्या रामु आणि शामुच्या आश्वासनांना भुलु नका, असा सतर्कतेचा इशारा देत हाजी अरफात शेख यांनी, विचार आणि विकासालाच मत देऊन ह्यावेळी मुंब्य्रात 'कमळ' फुलवण्याचे आवाहन मुंब्रावासियांना केले.

Post a Comment