विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयाचा पन्नासाव्या बॅचचा पदवी प्रदान सोहळा साजरा

 

 विद्या प्रसारक मंडळ टीएमसी विधी महाविद्यालय या प्रसिद्ध महाविद्यालयाचा पन्नासाव्या बॅचचा पदवी प्रदान सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभय ओक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री एस बी अग्रवाल, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री ईश्वर सूर्यवंशी, महाराष्ट्र व गोवा अधिवक्ता मंडळाचे माजी अध्यक्ष श्री गजानन चव्हाण आणि श्री सुदीप पासबोला तसेच विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि सचिव श्री अभय मराठे यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीविद्या जयकुमार यांनी सर्व अतिथींचे स्वागत करून या सोहळ्याची प्रास्तावना मांडली. ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विधी व्यवसाय हा फार कष्टाने व नियमित अभ्यासानेच करता येतो. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधीचा अभ्यास नियमितपणे सुरू ठेवावा व नवनवीन न्याय निर्णय वाचत रहावे असा सल्ला देऊन या व्यवसायात पदार्पण करणाऱ्या या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र व गोवा राज्य अधिवक्ता मंडळाचे माजी अध्यक्ष श्री गजानन चव्हाण व सुदीप पासबोला यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर अधिवक्ता मंडळ त्यांना मदत करेल अशी ग्वाही दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी त्यांच्या मनोगतात अपेक्षा व्यक्त केली की विधीशी संबंधित सर्व पुस्तके, माहिती व न्याय निर्णय हे सामान्य नागरिकांसाठी मराठी भाषेमध्ये असणे फार आवश्यक आहे व यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे व मराठी भाषेमध्ये कायद्याचे रूपांतर करून सामान्य नागरिकास ते उपलब्ध करून द्यावेत. सोहळ्याचे प्रमुख अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभय ओक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की विधि व्यवसाय हा आज जगभरात सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय झालेला असून या व्यवसायाने अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिलेले आहेत. अगोदरच्या काळामध्ये विधी पदवी घेतल्यानंतर वकिली हा एकमेव व्यवसाय उपलब्ध असायचा परंतु आता विधी पदवीनंतर अनेक प्रकारच्या संधी विद्यार्थ्यासमोर उपलब्ध आहेत. जसे वकिली, न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश होणे जसे की प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, कंपन्यांमध्ये विधी अधिकारी म्हणून कार्य करणे आणि विशेष कारणासाठी निर्माण केलेल्या न्यायालयामध्ये वकिली करणे, सरकारी वकील याशिवाय विधी महाविद्यालयामध्ये अध्यापक ही संधी उपलब्ध आहे. श्री ओक यांनी असेही सांगितले की मागील तीन वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन इंग्रजीमध्ये दिलेल्या निर्णयाचा भारतातील प्रमुख भाषेमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेतलेला असून आज पर्यंत हजारो न्याय निर्णय भारताच्या अनेक भाषेमध्ये भाषांतरित केलेला आहे. तसेच मागील 30 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायालयापर्यंत मराठीमध्येच काम केले जाते. स्वतःचे अनेक अनुभव सांगून वकिली व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणकोणत्या कौशल्याची आवश्यकता आहे याचीही माहिती यावेळी श्री ओक यांनी दिली. आज उपलब्ध असलेल्या साधनांमुळे कायद्याचा अभ्यास करणे, शोध करणे त्याचा अर्थ समजून घेणे व कमी वेळेत अनेक न्यायनिवाडे यांचे आकलन करणे फार सोपे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या साधनाचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी कायद्याचा योग्य तो अभ्यास करून वकिली व्यवसायामध्ये यशस्वी व्हावे अशी शुभेच्छा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विधी महाविद्यालयाच्या 150 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कामत यांनी केले तसेच ओळख श्री विनोद वाघ, श्री यतीन पंडित व श्रीमती हेतल मीशेरी यांनी करून दिली व आभार प्रदर्शन डॉ. रूपाली  जामोदे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत