flowers

जैन धर्माचा विचार, हा शाश्वत विचार..!

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदणी, कोल्हापूर येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवास उपस्थिती होते. यावेळी पंचकल्याणक प्रतिष्ठा आयोजन समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना 'प्रजागर्क' उपाधीने गौरविण्यात आले, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकल जैन समाजाच्या वतीने स्वागत आणि भव्य सत्कार करण्यात आला.


जैन धर्माचा विचार आणि तत्वे ही जगा आणि जगू द्या सांगणारी आहेत, जगाच्या पाठीवर अनेक विचार आले आणि संपले. पण जैन धर्माचा विचार हा टिकला, कारण तो लोककल्याणाचे तत्त्व सांगणारा आहे, म्हणून तो शाश्वत आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. जैन धर्माच्या तीर्थंकर आणि आचार्यांनी संपूर्ण जगाला अहिंसा आणि अपरिग्रह ही तत्त्वे दिली. यामुळे आज सर्वच क्षेत्रात जैन समाजाने प्रगती केली आहे, तसेच सर्वाधिक धर्मकार्य, दानकार्य आणि समाजकार्य करणारा हा जैन समाज असल्याचे, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.


आपल्या संबोधनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. नांदणी मठाला 2000 वर्षांची परंपरा आहे. या तीर्थक्षेत्राला लवकरच 'अ' वर्गाचा दर्जा देण्यात येईल, तसेच जैन समाजातील तरुणांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या महामंडळाचे देखील सर्वांगाने बळकटीकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. अलमट्टी धरणामुळे येणाऱ्या पुराचा प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले.


यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश अबिटकर, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. सुरेश खाडे, आ. राहूल आवाडे, आ. अमल महाडिक, आ. शिवाजीराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत