flowers

सेवा सहयोग फाउंडेशनचा परिषद : "विकसित भारताच्या निर्मितीत विकास क्षेत्राची भूमिका"


मुंबई, १४ डिसेंबर २०२४: सेवा सहयोग फाउंडेशनने आपल्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त "विकसित भारताच्या निर्मितीत विकास क्षेत्राची भूमिका" या विषयावर विचारमंथन परिषदेचे आयोजन केले. ही परिषद नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑडिटोरियम, मुंबई येथे पार पडली. या कार्यक्रमात कॉर्पोरेट क्षेत्र, शासन, शिक्षण क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांतील प्रमुख व्यक्तिमत्त्वांनी भाग घेतला आणि २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याच्या रणनीतींवर चर्चा केली.


भारत सरकारच्या "विकसित भारत" या प्रेरणादायी दृष्टिकोनात आर्थिक समृद्धी, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि प्रभावी शासनाचा समावेश आहे. या परिषदेत सर्वांच्या सहकार्याने या ध्येयाच्या पूर्ततेसाठी विकास क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात सेवा सहयोगचे संचालक विशाल हळदवेकर यांनी संकल्पनेची ओळख करून दिल्याने झाली. यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिषकुमार चौहान यांनी उद्घाटनपर भाषण केले. त्यांनी भारतीय उद्योजकांमधील विश्वासाचा मुद्दा मांडत, सोशल स्टॉक एक्सचेंजची संकल्पना उपस्थितांसमोर ठेवली.


कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे रवींद्र मिठे यांच्या संचालनाखालील परिसंवाद. यामध्ये अभिषेक लोढा (एमडी, लोढा ग्रुप), मृगांक परांजपे (माजी सीईओ, एमसीएक्स), आणि वेंकटेश मूर्ती (मुख्य मार्गदर्शक, यूथ फॉर सेवा) या मान्यवरांचा सहभाग होता. या चर्चेत, विकसित भारताच्या दिशेने विविध क्षेत्रांना विकास कार्याशी जोडण्यावर भर घालण्यात आला  पॅनेलिस्टांनी भौगोलिक क्षेत्रे, विशेषतः दिव्यांग लोक, आदिवासी समाज, तसेच शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज मांडली. त्यांनी समावेशक संपत्ती निर्मिती आणि सर्वांसाठी समान संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली. अप्रवासी भारतीयांच्या विकसित भारतामधील भूमिकेवरही चर्चा करण्यात आली.


याशिवाय, सामाजिक क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रभावाचे मापन करण्यासाठी अंतर्गत प्रणाली तयार करण्याची गरज मांडण्यात आली . तसेच विकासासाठी भारताचा स्वतःचा सामाजिक निर्देशांक असण्यावर भर देण्यात आला. 

एनएसईने सादर केलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंजच्या संकल्पनेचे उपस्थितांनी कौतुक केले.जास्तीत जास्त संस्थनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले . 


सेवा कनेक्ट: कार्यक्रमात सेवा सहयोग फाउंडेशनने विकसित केलेल्या "सेवा कनेक्ट" या डिजिटल प्लॅटफॉर्मचा सॉफ्ट लॉन्च करण्यात आला. डॉ. खुशबू टवरी मोदी यांनी विचारलेल्या या उपक्रमाचा उद्देश स्वयंसेवक, कॉर्पोरेट्स, आणि सामाजिक संस्थांना जोडत एक डिजिटल प्लॅटफॉर्म  तयार करणे आहे. या प्लॅटफॉर्म मूळे सेवा (सेवा कार्य) प्रभावी बनवण्याचा आणि सर्वांसाठी समन्वयपूर्ण वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे.  सेवा सहयोग फाउंडेशनअंतर्गत "सेवा कनेक्ट" प्रकल्प, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्था (यामध्ये NGO/ट्रस्ट/फाउंडेशन/स्वयंसेवक गट यांचा समावेश आहे) यांच्यातील परस्परपूरक दुआ असणार आहे . 


माजी नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी ऑनलाईन उपस्थित राहून "विकसित भारत" या संकल्पनेवर आपले विचार मांडले. त्यांनी सेवा सहयोग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रामाणिक संस्थांची ओळख पटवून त्यांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याची संधी असल्याचे सांगितले. त्यानंतर सेवा सहयोग फाउंडेशनच्या संचालक किशोरजी मोघे यांनी संस्थेच्या गेल्या १५ वर्षांच्या उल्लेखनीय यशस्वितेची माहिती सादर केली. सेवा सहयोग फाउंडेशनने १७ पैकी १६ शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये (SDGs) आपले ठसे उमटवले आहेत आणि दरवर्षी ५ लाखांहून अधिक जीवनावर सकारात्मक परिणाम साधला आहे. या संस्थेच्या १४ प्रमुख प्रकल्पांमध्ये शिक्षण, सशक्तीकरण आणि पर्यावरण यांचा समावेश आहे.


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित प्रेक्षकांनी AI आधारित साहाय्याने प्रश्नोत्तर व अभिप्राय सत्रात सहभाग घेतला.


हा कार्यक्रम २०४७ पर्यंत समृद्ध, समावेशक आणि शाश्वत भारत निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना दिशा देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. "सेवा कनेक्ट" उपक्रमाच्या संकल्पनेचे विशेष कौतुक करण्यात आले आणि त्याच्या भविष्यातील संपूर्ण लॉन्चसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत