लोक अदालतीतून ३ हजार ७४७ ग्राहकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा
कल्याण/भांडुप:तालुकास्तरावर २८ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीतून कल्याण आणि भांडुप परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी ३ हजार ७४७ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी ६ कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा केला.
कल्याण आणि भांडुप परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार ३ हजार ७४७ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व ६ कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा झाला. यात कल्याण परिमंडलातील कल्याण मंडल एक २५० प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ७१ लाख रुपयांची वसुली झाली. कल्याण मंडल दोनमध्ये २ हजार ३६२ प्रकरणे ४ कोटी ११ लाख रुपयांच्या वसुलीने सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलात ४२ प्रकरणांच्या निपटाऱ्यातून १९ लाख रुपयांची वसुली होऊ शकली. तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत २७ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या २०९ ग्राहकांची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.
भांडुप परिमंडलातील ठाणे मंडलात ३७ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या ३६६ ग्राहकांची प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. वाशी मंडल कार्यालयांतर्गत ४८२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ६७ लाख रुपयांची वसुली झाली. तर पेण मंडलात अडीच लाखांचा भरणा करणाऱ्या ३६ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली.
ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने तसेच भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे व कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, महावितरणच्या विधी विभागाने लोक अदालत यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment