मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
*ठाणे (जिमाका) :* शासकीय योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी शासनाने "मुख्यमंत्री योजनादूत" हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. यात सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत "मुख्यमंत्री योजनादूत" उपक्रम राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी एकूण 4 हजार 54 योजना दूत नेमण्यात येणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देणार आहेत.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे स्मार्ट फोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
या उपक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
Post a Comment